
औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात वाद पेटला
छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमाचा पुन्हा गौरव होत आहे. तर, दुसरीकडे औरंगजेबचा क्रूर इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात वाद पेटला आहे. नागपूरात हिंसाचाराचा प्रकार घडला. नागपूर हिंसाचार प्रकरणी परिस्थितीची पाहणी करायला आलेले काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारलं असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे.
औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारले असे वादग्रस्त वक्तव्य दलवाई यांनी केले आहे. ‘मारण्याची पद्धत पंडितांनी औरंगजेबाला सांगितली असं म्हणत इतिहासातील वस्तूस्थिती दुर्लक्षित करता येणार नाही असंही दलवाई म्हणाले. हुसेन दलवाई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरा औरंगजेबाचाही इतिहासही वाचावा. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली ती क्रुरता होती. ही बाब देवेंद्र फडणवीस मान्य करतील का? असा सवालही हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात अशा पद्धतीचे वातावरण कधीही नव्हते. महाराष्ट्रात नेहमीच सर्व धर्मांचे एकोप्याचे नातं राहिलेले आहे. अनेक सणांमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येतात. सरकारने जाणीवपूर्वक काही लोकांना मदत करते. मला वाटते ते चुकीचं आहे. सकाळी ज्यांनी आंदोलन केले त्यांना काहीच नाही ज्यांनी रात्री आंदोलन केले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असा आरोप हुसेन दलावई यांनी केला.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलास आंदोलनाची परवानगी द्यायला नको होती. पोलिसांची कारवाई एकतर्फी होती. झालेली घटना दुर्देवी होती. पोलिसांनी संयम बाळगायला हवा होता असंही हुसेन दलवाई म्हणाले.
