
राजस्थानहून मुंबई गाठली, पाणीपुरीही विकली; बुलेटच्या लोभाने सगळं केलं, पण…
रमेश मेनारिया (वय 31), हिम्मत गुजर (वय 32), आणि हिरालाल अहीर (वय 24) या तिघांचा एकच उद्देश होता, ते म्हणजे कसंही करून बुलेट्स मिळवणं. बराच काळ प्रयत्न करूनही अपयशच हाती लागलं. मात्र काही दिवसांनी त्यांनी मरीन ड्राइव्ह आणि अंधेरीमधून दोन बाईक्स चोरल्याच.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “ऑगस्टमध्ये ते मुंबईत आले आणि त्यांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ लॉक तोडून बुलेट चोरली. त्यापैकी दोघांनी गाडी त्यांच्या गावी परत नेली. मुंबईत रहात असताना त्यांनी प्रसंगी पाणीपुरीदेखील विकली. एका बाईकची चोरी यशस्वी झाल्यावर आणखी दोन बाईक मिळवण्याच्या इच्छेने ते (आरोपी) सप्टेंबरमध्ये मुंबईला परतले. मरीन ड्राईव्हवरून त्यांनी दुसरी बाईक चोरली आणि ती घेऊनही ते गावी गेले. ”अखेर पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून महत्वाची माहिती मिळाली. या तिघा आरोपींपैकी एक असलेला रमेश मेनारिया याच्या ठिकाणाची पोलिसांना माहिती मिळाली. तो ताडदेव परिसरात असल्याचे समजताच, पोलिसांनी सापळा रचून मेनारियाला अटक केली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याच्या इतर दोन साथीदारांपर्यंत पोहोणे फारसे कठीण नव्हते. गुज्जर आणि अहीर या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली.


