30 फूटावरून कोसळल्यानंतर काय घडलं चार वर्षाचा मुलगा रात्रभर मृत आईला बिलगून रडत होता
October 21, 2023
109 1 minute read
चंद्रपूर | चंद्रपूरमध्ये अत्यंत भीषण आणि दुर्देवी अपघात झाला आहे. मुलाला चॉकलेट आणायला जाते म्हणून एक गर्भवती महिला चार वर्षाच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडली. नदीवरील पुलावरून जात असताना स्कुटीवरून तिचं नियंत्रण सुटलं आणि गाडीसह ती 30 फूट खोल खाली कोसळली. या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला. सुदैवाने तिचा चार वर्षाचा मुलगा वाचला. पण त्याला अपघातात प्रचंड मार लागला आहे. आईचा मृत्यू झाल्यानंतरही तो रात्रभर मृतदेहाला बिलगून रडत होता. पुलाखालील हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मनात कालवाकालव झाली. अनेकांना अश्रू अनावर झाले.
बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली. सुषमा पवन काकडे असं या महिलेचं नाव आहे. ती तीन महिन्याची गर्भवती आहे. बामनीच्या आदित्य प्लाझा येथे सुषमा राहते. चार वर्षाच्या मुलाला चॉकलेट आणायला जाते असं सांगून ती घरातून बाहेर पडली होती. सोबत तिने मुलाला घेतलं होतं. बामनीवरून ती राजूराला जात होती. वर्धा नदीच्या पुलावरून जात असताना स्कुटीवरील तिचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे स्कुटी थेट 30 फूल खोल पुलावरून खाली कोसळली. त्यामुळे सुषमा गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्यासोबत तिचा मुलगाही कोसळला होता. त्यालाही बराच मार लागला. पण सुदैवाने तो बचावला. संध्याकाळी अंधार पडल्याने अपघात झाल्याचं कुणाच्याच लक्षात आलं नाही.
सुषमा घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबांने बरीच शोधाशोध केली. तिचा फोनही लागत नव्हता. नातेवाईकांकडे विचारपूस केली. पण ती काही सापडली नाही. अखेर तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि तक्रार दिली. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन रात्रभर सर्च ऑपरेशन केलं. पण तिचा शोध लागला नाही.गुरुवारी सकाळीच पोलिसांनी वर्धा नदीच्या पुलाकडे येऊन शोध घेतला. त्यावेळी नदीच्या किनारी सुषमाचा मृतदेह पडलेला आढळला. तिचा चार वर्षाचा मुलगा आईला बिलगून रडत होता. रात्रभर रडून रडून त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्याला बराच मारही लागला होता. मुलाला आईला बिलगून रडताना पाहून अनेकांचं हृदय हेलावून गेलं. अनेकांना तर अश्रू आवरण कठिण झालं पोलिसांनी तात्काळ सुषमाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. काकडे कुटुंबीयांनी बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ती हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर आम्ही शोधाशोध सुरू केली, असं बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितलं.