
संतोष देशमुख वर उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक
राज्यात निर्माण झालेली कायदा – सुव्यवस्था पायदळी तोडणाऱ्याना वर सरकार ॲक्शन मोडवर आहे. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली. वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान शनिवारी अजित पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणातील मास्टरमांइट कोणीही असेल तो सुटणार नाही असं म्हटलं होतं. दरम्यान पुन्हा एकदा बारामतीमध्ये बोलताना त्यांनी इशारा दिला.
बीडमध्ये सरपंचाची माणुसकीला काळिमा फासेल अशी घटना घडली, त्या घटनेचा मास्टरमाइंड कुणी असला तरी त्याची कितीही पोहच असली तरी त्याला सोडणार नाही. बीडच्या घटनेत आम्ही तिघांनी लक्ष घातलं आहे. अमानुष लोकांना फास्ट ट्रॅक केस चालून फाशीची शिक्षा होईल, अशी सजा त्यांना मिळेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, परभणीमध्ये घडलेल्या घटनेत देखील आम्ही लक्ष घातलं आहे. पोलीस यंत्रणेला देखील आदेश दिले आहेत, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बारामतीत देखील अनेक घटना घडत असतात, त्यामुळे आई वडिलांनी मुलांकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
